Homepage > हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।। भाविकांचा परतीचा प्रवास सुरू; एस. टी., रेल्वे स्थानकावर गर्दी
हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।। भाविकांचा परतीचा प्रवास सुरू; एस. टी., रेल्वे स्थानकावर गर्दी
09/11/2011 11:59
पंढरपूर। दि. 7 (प्रतिनिधी)
'हेचि दान देगा देवा।
तुझा विसर न व्हावा।
गुण गाईन आवडी।
हिच माझी सर्वगोडी।।
नलगे मुक्ति धनसंपदा।
संतसंग देई सदा।
तुका म्हणे गर्भवासि।
सुखे घालावे आम्हासी।।'
कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोप:यांतून आलेल्या दोन लाखांपेक्षा जास्त भाविकांनी आपला परतीचा प्रवास सोमवारी एकादशीचा उपवास सोडून सुरू केला. एस.टी., रेल्वे, खासगी वाहनांद्वारे मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन 'आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा रामराम घ्यावा' म्हणत सोमवारी आपल्या गावी परतले. बसच्या तुलनेत रेल्वेकडे प्रवाशांचा अधिक ओढा होता. आषाढी एकादशीला सुरुवात झालेल्या चातुर्मासाची समाप्ती आज झाल्याने महाराज व वारकरी मंडळींनी आपल्या गावी परतू लागले आहेत.
भाविकांनी सकाळपासून आपला परतीचा प्रवास सुरू केला. बसस्थानक, रेल्वेस्थानकावर जाणा:या भाविकांची गर्दी झाली. एस.टी़ने 60 हजारांपेक्षा जास्त तर रेल्वेने 80 हजारांपेक्षा जास्त भाविक माघारी परतले. जादा रेल्वेगाडय़ा व स्वस्त प्रवास यामुळे भाविकांचा बसच्या तुलनेत रेल्वेकडे अधिक कल होता. रेल्वेने कोल्हापूर, मिरज, लातूर, नागपूर्पयत थेट गाडय़ा सोडल्याने भाविकांची सोय झाली. रात्रंदिवस रेल्वेने जादा गाडय़ा सोडून जास्तीत जास्त भाविकांसाठी परतीच्या प्रवासाची सोय झाली. द्वादशीदिवशी सायंकाळी रेल्वेस्थानक प्रवाशांच्या गर्दीने भरले होते. रेल्वेच्या वाणिज्य विभागाने 80 हजारांपेक्षा जास्त भाविक परतल्याचे सांगितले.
परिवहन महामंडळाने 1800 जादा गाडय़ा यात्रेसाठी मागविल्या होत्या. यातील 900 गाडय़ा दशमीदिवशी मुक्कामाला होत्या. या गाडय़ांनी सारख्या खेपा करून 40 हजारांपेक्षा जास्त भाविकांच्या परतीच्या प्रवासाची सोय केली. भाविकांनी सोमवारी द्वादशीनिमित्त मठ, धर्मशाळा या ठिकाणी सकाळी भजन, कीर्तन व प्रवचनाचा आनंद लुटला. त्यानंतर दुपारी एकादशीचा उपवास सोडला. आषाढी एकादशीनंतर पंढरीत चार महिने मुक्कामास असलेल्या भाविकांचा चातुर्मास संपला. येथील चातुर्मासी महाराज मठात तसेच अंमळनेरकर मठ, देगलूरकर मठ, मुक्ताबाई मठ, बंकटस्वामी मठ आदी ठिकाणी असलेल्या भाविकांचा चातुर्मास संपला. ते भाविक आता पौर्णिमेनंतर आपल्या गावी परतणार आहेत. भाविकांनी आपला परतीचा प्रवास लवकर सुरू केल्याने येथील उलाढालही वाढली आहे.