Homepage > सुपर रेल्वेगाड्यांना थांबा;उड्डाणपुलाचा प्रश्न मांडला - ए. टी. पाटील
सुपर रेल्वेगाड्यांना थांबा;उड्डाणपुलाचा प्रश्न मांडला - ए. टी. पाटील
10/05/2011 11:34
जळगाव - जळगाव, चाळीसगाव येथे सुपरफास्ट रेल्वेगाड्यांच्या थांब्याचा प्रश्न, जळगावच्या पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलासह विविध प्रश्न जळगावचे खासदार ए. टी. पाटील यांनी आज लोकसभेत मांडले.
संसदेचे अधिवेशन सुरू असून, लोकसभेत या अधिवेशनात आज प्रथम जिल्ह्याचे प्रश्न मांडण्याची संधी भाजपचे खासदार पाटील यांना मिळाली. जळगाव हा व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. केळीचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पादन तसेच डालमिल उद्योग व या उद्योगांच्या माध्यमातून होणारी आयात- निर्यात यांमुळे देश- विदेशातील व्यापारी येथे येतात. त्यांना मुंबई, दिल्ली, कोलकता या महत्त्वाच्या शहरांना जाण्यासाठी सुपरफास्ट गाड्यांची सुविधा हवी. वास्तविक देशाच्या विविध महत्त्वाच्या शहरांकडे रेल्वेच्या सुपरफास्ट गाड्या जळगाव स्थानकावरून धावतात. मात्र, त्यांना जळगाव व चाळीसगाव येथे थांबा नाही. ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची असली, तरी सरकारने त्याकडे लक्ष दिलेले नाही, असे सांगून त्यांनी सचखंड, गोवा एक्स्प्रेस, पुष्पक, गीतांजली या सुपरफास्ट रेल्वेगाड्या जळगाव व चाळीसगाव स्थानकावर थांबवाव्यात, तसेच महापालिका हद्दीतील पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्नही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या पुलाच्या खर्चाचा काही वाटा किंवा रेल्वेकडे भरावयाची रक्कम महापालिकेने आधीच अदा केलेली आहे, तेव्हा हा प्रश्न का मार्गी लागत नाही, असा प्रश्नही खासदार पाटील यांनी संसदेत उपस्थित केला.
उधना रेल्वेमार्गाचे काम
सुरत- उधना रेल्वेमार्ग हा एकेरी असून, त्याचे दुहेरीकरण व्हावे म्हणून मागणी जुनीच आहे. या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरणाचे काम सुरूही झाले. सुमारे 70 कोटींचा खर्च झाला. मात्र, काम अपूर्णच आहे. तसेच जळगाव- सोलापूर रेल्वेमार्गाचे कामही सुरू करावे, अशा मागण्या श्री. पाटील यांनी आज मांडल्या.