Homepage > एक्स्प्रेस, पॅसेंजरमधून प्रवास करताना भाजीपाल्याचे ओझे
एक्स्प्रेस, पॅसेंजरमधून प्रवास करताना भाजीपाल्याचे ओझे
10/05/2011 11:33
भुसावळ - रेल्वेगाड्यांमध्ये फुकट्या प्रवाशांची अजूनही मोठी गर्दी होत असल्याने तिकीट तपासणीसाठी रेल्वेतर्फे खास तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. हे पथक कोणत्याही गाडीत कुठल्याही रेल्वेस्थानकवरून चढतात व प्रवाशांनी तिकिटे तपासणी करतात. तिकीट तपासणीसाठी सोबत रेल्वे सुरक्षा बलाचे जवानही मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहेत. एक्स्प्रेस, पॅसेंजरमध्ये भाजीपाल्याचे मोठमोठे ओझे टाकून प्रवाशांची गैरसोय करणाऱ्यांवर जवानांनी आणि तिकीट तपासनिसांनी कारवाई करावी व प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, सुरत, दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची गर्दी आहे. प्रवास करणारे असंख्य प्रवासी डब्यात उभे राहून प्रवास करीत आहेत; तर काही प्रवासी दरवाजात बसून प्रवास
करीत आहेत. ुसावळ विभागातील विविध रेल्वेस्थानकावर होणारी गर्दी पाहता व फुकट्या प्रवाशांना शासन होण्यासाठी आणि रेल्वेचा महसूल वाढण्यासाठी रेल्वेच्या वाणिज्य विभागातर्फे विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात साध्या पोशाखातील तिकीट तपासणीस असून, गाडीत अथवा फलाटावर तिकीट तपासणी करतात. आरक्षण नसताना आरक्षित डब्यात बसणे, विनातिकीट प्रवास करणे, महिलांच्या डब्यात बसून प्रवास करणे आदी कारणास्तव ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातच सुमारे एक लाखाचा दंड या पथकाने वसूल केला. ही मोहीम महिनाअखेरपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असून वेळ पडल्यास ही मोहीम तीव्र करण्यात येईल, असे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक डॉ. सुमंत देऊळकर यांनी सांगितले.
रेल्वे सुरक्षा बलाचे जवानही मोठ्या प्रमाणावर या पथकात सामील झाले आहेत. दंड न भरणाऱ्या प्रवाशांना या जवानांच्या ताब्यात दिले जाते. ज्यांच्याजवळ दंड भरण्यासाठी पैसेच नाहीत अशा प्रवाशांना न्यायालयात उभे करण्यात येऊन दंड न भरल्यास त्यांना शिक्षा करण्यात येते.
भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई अपेक्षित - एक्स्प्रेस, पॅसेजर गाड्यांमध्ये चढण्यासाठी जागा मिळत नसताना अनेक भाजीपाला विक्रेत्या महिला मोठमोठे गाठोडे टाकून प्रवाशांना अडचण निर्माण करतात. या गाठोड्यांमुळे डब्यात पाणी साचून प्रवाशांच्या बॅगाही खराब होतात. महिला असल्यामुळे कोणीही वाद घालत नाही. या प्रकाराकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवासी करीत आहेत. रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी पॅसेंजर गाडीतून मुंबईकडे प्रवास करून पाहावा व प्रवाशांचे किती हाल होतात याचा अनुभव घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.