ऊस संपल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही

09/06/2011 14:57

कुर्डुवाडी - विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने 2010-11 च्या चालू गळीत हंगामात जिल्ह्यात सर्वांत अधिक उसाचे 15 लाख टन गाळप केले असून शेतकऱ्यांचा ऊस संपल्याशिवाय कारखाना बंद केला जाणार नाही, अशी ग्वाही या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.
गंगामाईनगर, पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या 15 लाख 555 व्या साखर पोत्याचे पूजन आमदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. प्रारंभी या कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र रणवरे यांनी प्रास्ताविक केले. चालू गळीत हंगामाचा आलेख त्यांनी सादर केला. या समारंभास कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंगराव पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विलास सोनिमिंडे, कुर्डुवाडी शहर अध्यक्ष अर्जुनराव बागल, कारखान्याचे संचालक मारुतीराव बागल, वामनराव उबाळे, सीताराम गायकवाड, रमेश येवले-पाटील, अमोल चव्हाण, पोपट गायकवाड, ऍड. शैलेश मेहता, नगराध्यक्ष निवृत्ती गोरे, प्रा. जी. के. देशमुख, हिरप्पा जवळगे, रमेश पाटील, मारुती मस्तूद, पक्षनेते संजय गोरे, नगरसेवक युसूफभाई दाळवाले, अमर माने, बबन बागल, गणेश गोरे, बाळासाहेब खोत, किसन हानवते, दिलीप सोनवर, उपसभापती पंडित वाघ, हिम्मत सोलनकर, गौतम मोरे, शिवाजी पाटोळे, अनंता कुटे, गणपतराव माने, संजय डांगे आदी उपस्थित होते.

नोंद केलेला 60 हजार टन तर बिगर नोंदीची 25 हजार टन असा एकूण 85 हजार टन ऊस आजमितीस माढा तालुक्‍यात शिल्लक असल्याचे सांगून आमदार बबनराव शिंदे म्हणाले. या सर्व शिल्लक उसाच्या गळिताचे नियोजन केलेले आहे. 12 जून पर्यंत हा सर्व ऊस संपेल. मात्र त्यासाठी पावसाची साथ (तोपर्यंत पाऊस न पडणे) व कारखान्याचा घोटाळा नाही झाला पाहिजे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

शेतकऱ्यांनी उसाची मालकतोड करावी, असे आवाहन करून ते म्हणाले, त्यामुळे शेतकऱ्यांचे काहीही नुकसान होणार नाही. याची काळजी कारखान्याने घेतलेली आहे. मालकतोडी करणाऱ्या शेतकऱ्यांना कारखान्यातर्फे त्याचे प्रति टन 300 रुपये दिले जाणार आहेत. शिवाय उशिरा तोडलेल्या (या महिन्यात) उसाला कारखाना प्रति टन 100 रुपये जादा भाव देणार आहे. असा जादा दर देणारा राज्यातील हा एकमेव कारखाना आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी मालकतोडीने ऊस आणण्याचा प्रयत्न करावा.

या हंगामात ऊस शिल्लक राहिला तर त्या उसाला शासनाने 50 हजार रुपये हेक्‍टरी म्हणजेच एकरी 25 हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, अशी आम्ही मागणी केली आहे. शिवाय या राहिलेला उसाचे पुढच्या वर्षीच्या गळीत हंगामात प्रथम क्रमांकाने गाळप केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
हिराप्पा जवळगे म्हणाले, ""ऊस संपेपर्यंत साखर कारखाना बंद करू नये. पाऊस झाला तर बैलगाडीने ऊस वाहतूक करावी. गळितात उच्चांक निर्माण करणाऱ्या या कारखान्याने दरातही उच्चांक करावा.'' आभार संचालक सीताराम गायकवाड यांनी मानले.

विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे जिल्ह्यात एक क्रमांकाचे गळीत साखरेच्या दर्जात ही नंबर एक माढा तालुक्‍यात आजमितीस शिल्लक असलेल्या नोंद केलेल्या 60 हजार टन व बिगर नोंदीचा 25 हजार टन असा एकूण 85 हजार टन उसाचे गाळप 12 जूनपर्यंत विठ्ठलराव शिंदे व विठ्ठल शुगर्स कारखाना करणार.

उशिराने ऊस तोडलेल्या शेतकऱ्यास प्रति टन 100 रुपये जादा भाव देणारा राज्यातला एकमेव कारखाना.  या हंगामात शिल्लक राहणाऱ्या उसास शासनाने प्रत्येक एकरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, आमदार बबनराव शिंदे यांची मागणी.


solapur pune pravasi sangatana